
नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.) - राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये झालेल्या ५८४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या मृत्यूंमागील मुख्य कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली असून राज्यातील सर्व आश्रमशाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या शाळा आणि संस्थाचालकांवर थेट कारवाई केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली. नाशिक दौऱ्यावर असलेले मंत्री उईके यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आणि आदिवासी आघाडीचे महामंत्री एन. डी. गावित उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील घटनेचा उल्लेख करत मंत्री उईके म्हणाले, “१९९२ पासून सुरू असलेल्या या अनुदानित शाळेत ७९ विद्यार्थिनी एकाच खोलीत ठेवण्यात आल्या होत्या. सर्पदंशामुळे तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आम्ही विद्यार्थ्यांचे इतरत्र स्थलांतर केले आहे.” आश्रमशाळांना भेटी देणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी तेथे जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे स्पष्ट करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI