मोतीलाल नगर पुनर्विकासातून तब्बल १५ एकर हरित क्षेत्राची निर्मिती!
* उत्तर-पश्चिम मुंबईच्या ‘ऑक्सिजन’मध्ये मोतीलाल नगर भर घालणार * गोरेगावातील मध्यवर्ती ठिकाणी उभी राहणार पर्यावरणपूरक टाऊनशिप मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) हाती घेतलेल्या गोरेगाव पश्चिम य
मोतीलाल नगर पुनर्विकास म्हाडा


* उत्तर-पश्चिम मुंबईच्या ‘ऑक्सिजन’मध्ये मोतीलाल नगर भर घालणार

* गोरेगावातील मध्यवर्ती ठिकाणी उभी राहणार पर्यावरणपूरक टाऊनशिप

मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) हाती घेतलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पातून येथे तब्बल १५ एकर हरित क्षेत्राची निर्मिती होत आहे. गोरेगावसारख्या पश्चिम उपनगरातील ऐन मध्यवर्ती, दाटीवाटीच्या परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पात अशा मोठ्या प्रमाणातील हरित क्षेत्र मुंबईतील उत्तर-पश्चिम उपनगरांच्या ‘ऑक्सिजन’मध्ये भर घालणार असून, येथील रहिवाशांच्या आरोग्य व पर्यावरणपूरक जीवनशैलीकरिता महत्वाचे ठरणार आहे.

सुमारे १४३ एकर भूखंडावरील या वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाद्वारे सी&डीए (बांधकाम व विकास संस्था) मॉडेलवर होत आहे. काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्पाचा मास्टर प्लान (समग्र विकास आराखडा) रहिवाशांना सादर करण्यात आला होता. गोरेगाव पश्चिम येथील न्यू लिंक रोड लगत मोतीलाल नगर १ आणि मोतीलाल नगर २, ३ असे दोन भूखंड आहेत. या वसाहतींतील मिळून सुमारे ३७०० म्हाडा सदनिकाधारक रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणारा देशातील सर्वांत मोठा, सुमारे १ लाख कोटी रुपये मूल्याचा ‘ब्राऊनफिल्ड’ गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प आहे.

प्रकल्पाच्या मास्टर प्लाननुसार येथील १५ एकरांचे हरित क्षेत्र हे या वसाहतीच्या एकूण भूखंडाच्या १० टक्क्यांहून अधिक असल्याने सदर तरतुदीने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच, पुनर्वसन इमारतींच्या पोडीयम स्तरावरील मुख्य, मोठ्या हरित क्षेत्रांसह वसाहतीतील अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात हरित जागा असणार आहेत. यांसह रस्ते, पादचारी मार्ग यांच्या लगत भरपूर वृक्षलागवड करून वृक्ष-आच्छादित मार्गांचीही निर्मिती करणार असल्याचे म्हाडाने म्हटले आहे.

सध्याच्या १५०० हून अधिक वृक्षांचेही संवर्धन

मोतीलाल नगर वसाहतींत सध्या असलेल्या तब्बल १५०० हून अधिक वृक्षांची तोडणी न करता त्यांचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. यामध्ये भेंड (इंडियन ट्युलिप), कडुलिंब, वड, कदंब, जांभूळ, उंबर, आंबा, फणस, नारळ, सप्तपर्णी, देशीबदाम अशा अनेक भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे संवर्धन होणार आहे.

१४३ एकरांमधील अवाढव्य टाऊनशीपच्या निर्मिती दरम्यान येथील नव्या इमारती, अंतर्गत रस्ते, सोयीसुविधा यांची उभारणी करताना आणि नव्या हरित क्षेत्राची निर्मिती करतानाच, वसाहतीत आधीपासून असलेल्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांचेही संवर्धन म्हाडा करत असल्याने ही बाब लक्षवेधी ठरत आहे.

मुंबईसाठी पथदर्शी

म्हाडाने मागील काही काळापासून समूह (क्लस्टर) पुनर्विकासावर भर दिल्याने अनेक ठिकाणी मोठ्या व सलग टाऊनशिप्सच्या उभारणीचा मार्ग मोकळा होतो आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रशस्त घरे मिळण्यासोबतच मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्माण करणेही शक्य होत आहे. मोतीलाल नगर हे या मॉडेलचे उत्तम उदाहरण म्हणून प्रस्थापित होत आहे.

पुढील काळात मुंबई व उपनगरांतील अन्य विविध वसाहतींचा पुनर्विकास करताना अशाचप्रकारे योग्य नियोजन करून हरित क्षेत्राची निर्मिती करण्याचे संकेत म्हाडाने या प्रकल्पातून दिले आहेत.

रहिवाशांना स्वच्छ, निरोगी जीवनशैलीचा आनंद

या प्रकल्पातून रहिवाशांना शांत, स्वच्छ व निरोगी जीवनशैली जगण्याचा मार्ग, तोही शहराच्या मध्यवर्ती भागात राहून उपलब्ध होणार आहे. विद्यमान मेट्रो ३ तसेच, वेगाने काम सुरु असलेला वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प यांमुळे गोरेगाव हे पश्चिम उपनगरांतील ‘वेल-कनेक्टेड’ मध्यवर्ती केंद्र बनत असताना, येथे इतक्या मोठ्या हरित आणि वृक्षवेली – उद्यानांनी युक्त वसाहतीत राहण्याची संधी मिळत असल्याने रहिवाशांचा आनंदही द्विगुणीत होणार आहे.

“क्लस्टर (समूह) पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन घरे उभारणे नव्हे, तर सर्वांगीण सक्षम नागरी वसाहत उभी करणे आहे. मोतीलाल नगरमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, शाश्वत नियोजन आणि सुमारे १५ ते १७ एकरांवरील हरित क्षेत्राच्या निर्मितीवर विशेष भर देण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पात उद्याने आणि मोकळ्या जागांचा समावेश करून, निसर्ग आणि नागरी जीवन यांचा उत्तम समतोल साधणारी, एक भविष्याभिमुख वसाहत (नेबरहुड) निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

- संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष व सीईओ, म्हाडा

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande