
-गणेशोत्सवासाठी शहरात २८; तर ग्रामीण भागात ३२ गणेश मंडळे
यवतमाळ, 17 सप्टेंबर (हिं.स.)। आर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत यावर्षी तब्बल १६० गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एक गाव, एक गणपती उपक्रम राबविणार्!या १९ गावांचा समावेश आहे. शहरात २८, तर ग्रामीण भागात १३२ गणेश मंडळे आहे.
गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर्णी तालुक्यासह दिग्रस तालुक्यातील काही गावांचाही समावेश आहे. या संपूर्ण कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी लक्ष ठेवण्याबरोबरच गणेश मंडळांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी सहा पोलिस अधिकारी व ५७ कर्मचारी कार्यरत आहेत.
याशिवाय बाहेरील बंदोबस्तातून एक पोलिस अधिकारी, दहा पोलिस कर्मचारी आणि ३५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मिरवणुकीच्या मार्गावरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, ध्वनिप्रदूषण टाळावे आणि मिरवणुकी दरम्यान शिस्त राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे भक्ती, सामाजिक सलोखा आणि शिस्तीच्या वातावरणात गणेशोत्सव पार पडणार आहे.
डीजेऐवजी ढोल-ताशे, बँडचा गजर....
यावर्षी डीजेवर बंदी असल्याने गणरायाचे आगमन ढोल-ताशे आणि बँडच्या गजरात करण्यात आले. अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत गणरायाचे स्वागत केले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी