
रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून साथरोगांचा जिल्ह्यात फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दि. 10 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रेल्वे स्थानके, एस.टी. बस स्थानके तसेच विविध चेक पोस्टवर 16 वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आतापर्यंतच्या तपासणीत 435 रुग्णांची नोंद झाली.
या सर्व रुग्णांवर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी मोठ्या संख्येने एस.टी. बस तसेच रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात, त्या ठिकाणांहून विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १६ विशेष वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार, नमुना संकलन तसेच पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येत आहे.
दि. 10 सप्टेंबरपासून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये सर्दी-खोकला, विशेष ताप, कावीळ, अतिसार-हगवण तसेच इतर किरकोळ आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत.
तपासणीदरम्यान आढळून आलेल्या रुग्णांकडून ते कोणत्या गावात जाणार आहेत आणि किती दिवस मुक्काम करणार आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित रुग्णांच्या वास्तव्याच्या ठिकाणच्या आरोग्य संस्थांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत तसेच रुग्णांवर औषधोपचार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांनी आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधोपचार न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. ताप, सर्दी-खोकला, अतिसार, उलट्या, कावीळ अथवा इतर आजारांची लक्षणे असल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी