
परभणी, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
महानगरपालिकेतील कर्मचार्यांसह कामगारांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच्या थकीत वेतनासह अन्य मागण्यांसंदर्भात सुरु केलेल्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी व मानवी दृष्टीकोन समोर ठेवून तोडगा काढावा व आंदोलनकर्त्या कर्मचार्यांसह सर्वसामान्य नागरीकांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. गेल्य 24 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांसह कुटूंबियांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. विशेषतः त्यांच्यासह कुटूंबियांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन संसार चालवावा तरी कसा, व अन्य जबाबदार्या पार तरी कशा पाडाव्यात? असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांकडे मानवी दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. अन्यथा कायमस्वरुपी व कंत्राटी कामगारांसमोर मोठे संकट उभे राहील, मुलांचे शिक्षण व भविष्य अंधारात येईल, असा इशारा दिला. सणा-सुदीच्या काळात या आंदोलनकर्त्यांवरील हे संकट तसेच महापालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरीकांवरील गंडांतर टाळण्याकरीता प्रशासनाने तातडीने हालचाली सुरु कराव्यात, असे जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis