
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। बदलत्या माध्यमविश्वात पारंपरिक पत्रकारितेसोबत डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. पत्रकारांनीही आता सोशल मीडिया व नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. माहिती व जनसंपर्क विभागही बदलत्या माध्यम व्यवस्थेनुसार आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत आहे, असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे नवनियुक्त उपसंचालक प्रवीण टाके यांची पत्रकार, संपादकांनी भेट घेतली. त्यानिमित्त त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संवाद साधला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहायक संचालक सुरेश पाटील, माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांच्यासह विविध दैनिके, साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.
नव्याने रुजू झालेले उपसंचालक प्रवीण टाके तसेच सहायक संचालक सुरेश पाटील व माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना आपली ओळख करून दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी सर्व संपादक पत्रकारांचे स्वागत केले. तसेच पत्रकारांचा परिचय करुन दिला.स्थानिक स्तरावरील पत्रकारांच्या समस्या यावेळी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.
उपसंचालक प्रवीण टाके म्हणाले की, डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. पत्रकारांनी डिजिटल माध्यमांचे आव्हान स्वीकारून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा.पत्रकारांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या समस्या, दैनंदिन अडचणी सोडवण्यास प्रशासनाचा प्राधान्य क्रम राहील,असेही त्यांनी सांगितले.
माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis