
रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात काल मध्यरात्री सर्वत्र गोकुळाष्टमीचा सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिरात कृष्णजन्माष्टमीचा मुख्य सोहळा अतिशय भव्य आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने वाजवले जाणारे ढोल-ताशे हे मुख्य आकर्षण होते. ढोल-ताशांच्या गजर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या तालांवर संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. रात्री पार पडलेल्या कृष्णजन्म सोहळ्यावेळी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
या सोहळ्यादरम्यान मंदिरात विशेष भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सुश्राव्य भजन आणि भावपूर्ण कीर्तनाने मंदिरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. या मुख्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि बालगोपालाचे दर्शन घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. विशेषतः महिला आणि तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपरिक वेशभूषेत नटून थटून आलेल्या महिला आणि तरुणींमुळे या धार्मिक सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली होती.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी अशा सर्वच भागांमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला. ठिकठिकाणी मंदिरांवर केलेली मनमोहक रोषणाई, फुलांची सजावट आणि भाविकांचा जयघोष यामुळे संपूर्ण जिल्हा कृष्णमयी झाला होता. दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिवसभरात ठिकठिकाणी पाहायला मिळाले.
दरम्यान, आज दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा उत्साह सुरू झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी