
मविप्र ‘सीएमसीएस’ महाविद्यालयात तीन दिवसीय ‘ज्ञानोदय २०२६’
नाशिक, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
: स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थेच्या शिक्षणमहर्षी व कर्मवीरांनी ‘शिक्षणातून स्वातंत्र्य’ हा विचार मांडत समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीला प्राधान्य दिले. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणपद्धतीत अधिक लवचिकता आली आहे. विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि भविष्यातील करिअरचा विचार करून विविध शैक्षणिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेची विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यावी आणि विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करावा. शिक्षणासोबत रोजगारक्षम कौशल्ये विकसित करून ज्ञानप्राप्तीतून व्यक्तिमत्त्व विकास साधावा. शिक्षणाचा प्रवाह समजून घेताना विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मविप्र कर्मवीर ॲड. नामदेवराव माधवराव ठाकरे ‘सीएमसीएस’ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानोदय २०२६’ या संकल्पनेवर आधारित ‘इंडक्शन प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महाविद्यालयीन वातावरण, विविध शैक्षणिक पद्धती व सहशैक्षणिक उपक्रम, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील विविध संधींची माहिती देत तीन दिवस विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अतिरिक्त क्रेडिट व परीक्षा, सर्वोत्तम सराव पद्धती, जीवनकौशल्ये, ग्रंथालय व अध्ययन संसाधने, योग व ध्यान, मनाची शक्ती, राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका, माजी विद्यार्थ्यांशी संवाद, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ आदी विविध विषयांवर आधारित उपक्रम आणि माहितीपटांच्या माध्यमातून प्राध्यापकांनी सादरीकरण केले.
नाशिक शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. बी. जी. वाघ, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, उद्योजक संतोष काळे, डॉ.शैलेद्र गायकवाड, प्राचार्य डॉ. मधुकर शेलार, माजी विद्यार्थी व उद्योजक राजस निंकुंभ, समन्वयक डॉ.अमित मोगल उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI