
लातूर, 07 सप्टेंबर (हिं.स.): नवीन पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जबाबदारी अतिशय महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद येथे केले. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अहमदपूर यांच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील ४ अंगणवाडी सेविका व १५ मदतीस यांना सहकारमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, उपसभापती आयोध्या केंद्रे, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, जिल्हा परिषद सदस्य प्रफुलचंद्र गुंडरे, अश्विन नागराळे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी अस्मिता गायकवाड, बाल प्रकल्प विकास अधिकारी राजेश गझलवाड, महिला बाल प्रकल्प विकास अधिकारी विद्या लोमटे, ग्राम विकास अधिकारी प्रशांत घुगे, पंचायत समिती सदस्य रविंद्र बोडके, माधव सरवदे, सुरेखा मुंडे, आशिष तोगरे सह विविध मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं काम हे भविष्यातील विद्यार्थी घडवण्याचा असून, हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. आईचं ममत्व सुद्धा आपल्याला या विद्यार्थ्यांना द्यावं लागतं आपण सर्वांनी या सर्व बालकांना शिस्त, संस्कार देवून देशाची एक सुसंस्कृत पिढी घडवावी, असे सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले. यावेळी अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती उत्तम माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक बाल प्रकल्प विकास अधिकारी राजेश गझलवाड यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis