कोल्हापूर - अग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्य भरती कार्यालयामार्फत येत्या 17 ते 29 सप्टेंबर या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भरती मेळावा यशस्वी होण्याच्या अन
अग्निवीर भरती मेळावा


कोल्हापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्य भरती कार्यालयामार्फत येत्या 17 ते 29 सप्टेंबर या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भरती मेळावा यशस्वी होण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख यंत्रणांची आढावा बैठक विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी म्हणाले,सैन्य भरतीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी गांभीर्यपूर्वक पार पाडावी.यामध्ये हलगर्जीपणा होता कामा नये.तसेच संपूर्ण भरती ही पारदर्शक व गुणवत्तापूर्ण होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थाच्या अमिषाला बळी पडू नये. या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येक विभागाने नोडल ऑफिसर त्यांच्या मोबाईल क्रमांकासह नेमावा अशी सूचना करून या आढावा बैठकीसाठी अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा (शो कॉज) नोटीस देण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले .

राज्यातील सातारा,सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्याचबरोबर गोवा राज्यातील दक्षिण/उत्तर जिल्ह्यातील अधिवास असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र होणार आहेत.संपूर्ण लष्कर भरती प्रक्रिया ही गुणवत्तेवरच होणार आहे.

यावेळी सैन्य भरतीसाठी सर्व सुविधांयुक्त मैदान उपलब्ध व्हावे.भरतीच्या वेळी गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. त्याचबरोबर भरती दरम्यान अधिकार्यांसाठी निवास व वसतीगृह व्यवस्था उपलब्ध व्हावी.भरतीच्या वेळी प्रतिदिन पाच हजार लिटर इतकी क्षमता असणाऱ्या पाणी टँकरची व्यवस्था व्हावी. 29 सप्टेंबर रोजी महिला लष्कर भरती होणार असल्याकारणाने दोन शिफ्टमध्ये महिला पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी कर्नल तथा संचालक (भरती) सैनिक कार्यालय प्रशांतसिंग यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. भरती प्रक्रिये दरम्यान प्रशासनाककडून सर्वतोपरी साहाय्य मिळेल अशा शब्दात जिल्हाधिकारी श्री राठोड यांनी प्रशांतसिंग यांना यावेळी आश्वस्त केले.

या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी एमएसईबी,बीएसएनएल, शिवाजी विद्यापीठ,पार्किंग व वाहतूक व्यवस्थाआरोग्य,मनपा शिक्षण,रोजगार (एम्प्लॉयमेंट) कार्यालय,पोलीस बंदोबस्त आदी विभागांचा सविस्तर आढावा घेतला .

या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त किरणकुमार धनवडे,राधानगरी प्रांतधिकारी प्रसाद चौगुले , करवीर तहसीलदार स्वप्निल पवार,सुभेदार मेजर लखविंदरसिंग,पोलीस उपधीक्षक राजेंद्र मस्के,मोटर वाहन निरीक्षक योगेश सरोदे , डॉ. रेश्मा पाटील,क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भीमसेन चवदार,सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते .

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande