गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात आणि मानवनिर्मित, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अ
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना


शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात आणि मानवनिर्मित, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाची गोपीनाथ मुंड शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना महत्वपूर्ण ठरत आहे.

घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होते. ऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत होती. या योजनेत बदल करून दि. १९ एप्रिल २०२३ पासून अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी नवीन ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. या नवीन योजनेत शेतकऱ्यांसाठी अनुकूल कार्यपद्धती अवलंबली आहे. योजनेचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुकास्तरावरील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला देण्यात आले आहेत. अपघात घडल्यानंतर 30 दिवसाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव वारसदारानी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरीत मदत वाटप थेट बँक खात्या करण्याची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी करणार आहे.

अपघाताचे स्वरूपामध्ये शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू कीडनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचे हल्ल्ये, चावणे यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल अन्य कोणतेही अपघात, तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणतेही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व यासह आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कुटुंबाची व्याख्या आणि अनुदानात अपघाताच्या दिवशी स्वतः वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य यात आई-वडील, शेतकऱ्याचा पती-पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती, असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना समावेश राहणार आहे. अपघाती मृत्यू, तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रूपये लाभ अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभासाठी अपघात घडल्यानंतर तीस दिवसांच्या आत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, फेरफार उतारा ६ ड, वारसनोंद उतारा ६ क, शेतकऱ्याच्या वयाचा दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल, मरणोत्तर अहवाल, शवविच्छेदन अहवाल, वाहन परवाना, पाण्यात बुडून बेपत्ता झाल्यास प्रथम माहिती अहवाल आणि शेतपूर्ती बंधपत्र आवश्यक, बाळंतपणात मृत्यू झाला असल्यास शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहे.

गजानन कोटुरवार,

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande