मतदारांच्या हक्कासाठी भारत निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज - परवीनकुमार थिंड
मुंबई उपनगर, 4 मे (हिं.स.) मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते.
मतदारांच्या हक्कासाठी भारत निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज - परवीनकुमार थिंड


मुंबई उपनगर, 4 मे (हिं.स.) मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते. लोकसभेची यंदाची निवडणूक मुक्त व निर्भय होण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बाजवता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते मतदारदूतांपर्यंत सर्वांचीच भूमिका महत्वाची असणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी केले.

वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील किमान 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि अपर जिल्हाधिकारी तथा 'स्वीप' चे मुख्य नोडल अधिकारी किरण महाजन यांच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सहकारी संस्था सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे मुख्य समन्वयक डॉ. किरण महाजन, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (2) पूर्व उपनगरेचे श्री. दहिभाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (3) पश्चिम उपनगरचे श्री. वीर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (4), मुंबई, स्वीपच्या आयकॉन ॲड. अश्विनी बोरुडे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्री. थिंड म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमांदरम्यान मतदानासंबंधित काही समस्या असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत उर्त्स्फुतपणे सहभाग घेवून भावी पिढीसमोर एक आदर्श ठेवावा.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार गृहनिर्माण संस्थांमध्ये 73 लाख लोकसंख्या आहे. या गृहनिर्माण संस्थांमध्ये सुमारे 20 लाख मतदार आहेत. निश्चितच मतदानाच्या प्रक्रियेत 50 टक्के मोलाचा वाटा हा या गृहनिर्माण संस्थांचा आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष तसेच सचिवांना मतदान केंद्रावरील मतदार दूत म्हणून काही विशेष अधिकार दिले आहेत. आपण आपल्या संस्थामधील एकुण किती कुटुंब आहेत. त्यामध्ये किती नागरिकांचे मतदान आहे. याची एक यादी तयार करावी. त्यांनतर त्यांना 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. माझा देश कोणी चालवावा हे ठरविण्याचा अधिकार मला आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावेळी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी जर शंभर टक्के मतदान केले तर त्या संस्थांचा राष्ट्रीय मतदार दिनी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

डॉ. महाजन म्हणाले की, मुंबई मध्ये येत्या 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात सहकारी संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या संस्थांमध्ये हजा़रोंच्या संख्येने मतदार रहिवासी आहेत. या मतदारांना आपल्या मतदार संघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, किंवा सभासदांनी मार्गदर्शन करावे, तसेव महिला आणि नव मतदार यांना मतदान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करावे. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी व्हॉट्सअपचा गृप तयार करावा. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्रीय कार्य म्हणून सर्वांनी या प्रक्रियेत उर्त्स्फुतपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री. महाजन यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाची सुरूवात राज्य गीताने करण्यात आली आणि मतदार जागृती करण्यासाठी ‘ऐक जरा मतदारा, तुला लोक शाहीची आण’.. भारूड या लोककलेचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंड यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी आणि जिल्हा उपनिबंधक श्री. दहिभाते, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘मी मतदान करणार’ असा संकल्पही यावेळी घेण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande