नवी दिल्ली, १ ऑगस्ट (हिं.स.) :
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाला होता. लंडनमधील किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र, कॅन्सरशी लढा अखेर अयशस्वी ठरला. गेल्याच महिन्यात ते लंडनमधून भारतात परतले होते.
अंशुमन गायकवाड यांचा भारतीय क्रिकेटमधील १२ वर्षांचा कार्यकाळ अत्यंत उल्लेखनीय होता. त्यांनी १९७५ ते १९८७ या काळात ४० कसोटी आणि १५ वनडे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी पाकिस्तानविरुद्ध कुटलेल्या २०१ धावांची होती. त्यामुळे त्यांचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अमर झाले. गायकवाड यांना त्यांच्या खेळातील संयम आणि कणखरतेसाठी ओळखले जायचे, ज्यामुळे त्यांना ग्रेट वॉल ऑफ इंडिया हे टोपणनावही मिळाले होते.गायकवाड यांनी खेळाडू म्हणूनच नव्हे, तर प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी १९९७ ते १९९९ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २००० साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेतेपद पटकावले. प्रशिक्षकपदाच्या काळात त्यांनी संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला आणि संघाला एकत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले.
गायकवाड यांनी बीसीसीआयच्या निवड समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांनी भारतीय क्रिकेटला घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या खेळातील गुणवत्ता उंचावली.गायकवाड यांचे निधन भारतीय क्रिकेटसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या आठवणी आणि योगदान भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात सदैव जिवंत राहतील. भारतीय क्रिकेट जगताने एक महान खेळाडू, प्रशिक्षक गमावला आहे.
हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी