रायगड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)
शिवसेना (शिंदे गट) रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या पुढाकारातून पोयनाड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ३५ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून, शेकडो बेरोजगार युवक-युवतींना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी राजा केणी यांच्या उपक्रमाचे कौतुक करत, “तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून अशा मेळाव्यांचे आयोजन ही काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
मेळाव्यात नर्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी, बीपीओ, केपीओ, आयटीआय, फार्मा आदी क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या विविध पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या. यामध्ये अनेक उमेदवारांची निवड होऊन, काहींना जागेवरच ऑफर लेटर देण्यात आले.
या वेळी राजा केणी आणि मानसी दळवी यांनी सर्व कंपन्यांच्या स्टॉलना भेट देत, प्रतिनिधींशी संवाद साधला. युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य भागांसाठीही आदर्श ठरत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका संजीवनी नाईक, कामगार नेते दीपक रानवडे, शैलेश पाटील, संदेश थळे, रसिका केणी, अँड. सिया पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजा केणी म्हणाले, “तरुणांमध्ये कौशल्य आहे, पण संधी मिळाल्या पाहिजेत. रोजगार मेळावा म्हणजे त्या संधी उपलब्ध करून देण्याचे एक माध्यम आहे.”
या उपक्रमामुळे अलिबाग परिसरातील युवकांना आशेचा नवा किरण मिळाला असून, उपस्थित कंपन्यांनीही अशा मेळाव्यांची वारंवार गरज असल्याचे मत मांडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके