भारताची स्टील फ्रेम – अखिल भारतीय सेवा आणि राष्ट्रनिर्माण
एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन केवळ त्याच्या भूगोलाने नव्हे तर त्याच्या संस्थांची कार्यक्षमता, निष्पक्षता आणि लवचिकतेने केली जाते. स्वातंत्र्योत्तर भारतात, अखिल भारतीय सेवा (आयएएस, आयपीएस आणि आयएफओएस) या प्रशासनाच्या कण्याप्रमाणे कार्य करत आहेत, या स
भारताची स्टील फ्रेम – अखिल भारतीय सेवा आणि राष्ट्रनिर्माण


एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन केवळ त्याच्या भूगोलाने नव्हे तर त्याच्या संस्थांची कार्यक्षमता, निष्पक्षता आणि लवचिकतेने केली जाते. स्वातंत्र्योत्तर भारतात, अखिल भारतीय सेवा (आयएएस, आयपीएस आणि आयएफओएस) या प्रशासनाच्या कण्याप्रमाणे कार्य करत आहेत, या सेवांनी केंद्र आणि राज्यांमधील सुसंवाद सुनिश्चित केला आणि शासन व नागरिक यांच्यातील दुवा साधला. या सेवांचे वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले योगदान हे दर्शवते की सरदार वल्लभभाई पटेल यांची दृष्टी आजही एका मजबूत, एकसंघ आणि प्रतिसादक्षम राष्ट्राच्या कार्यपद्धतीस दिशा देणारी आहे.

स्टील फ्रेमचा जन्म

स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्राची स्थिती ओळखून, सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्यावसायिक, निष्पक्ष आणि कार्यक्षम नागरी सेवांची आवश्यकता अधोरेखित केली. हीच “स्टील फ्रेम” केंद्राला विविध राज्यांशी जोडेल, धोरणांची समतोल अंमलबजावणी करेल आणि कायदा व सुव्यवस्था राखून आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देईल. हे निक्षून सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांना ठाऊक होते की केवळ राजकीय एकता पुरेशी नाही; मजबूत संस्था हाच तत्त्वांना व्यवहारात उतरवण्याचा आणि शांतता व प्रगती टिकवून ठेवण्याचा पाया आहे.

प्रशासकीय एकसंधता आणि स्थैर्य

अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि जनतेमधील कार्यक्षम दुवा म्हणून देशभरातील जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये कार्यरत असतात, निवडणुका पार पाडणे, सामाजिक कल्याण योजना राबविणे, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवणे या सर्व कार्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची उपस्थिती शासनाला केवळ शहरी केंद्रांपुरते मर्यादित ठेवत नाही, तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात सहभागी बनवते. अनेक भागांमध्ये अधिकारी आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक नियोजन आणि सामाजिक उपक्रमांमध्येही नेतृत्व करतात, ज्यातून या “स्टील फ्रेम”चा बहुआयामी प्रभाव दिसतो.

संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण

नैसर्गिक आपत्ती असो, सामाजिक अशांतता असो किंवा महामारी, अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत सातत्य, समन्वय आणि नेतृत्व प्रदान करतात. केंद्राच्या धोरणांना स्थानिक वास्तवाशी सुसंगत ठेवण्याची त्यांची क्षमता भारताला अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास आणि विविधतेत एकता टिकवण्यास सक्षम करते. आसाममधील पुरापासून गुजरातमधील भूकंपापर्यंत, संकट काळातील त्यांचे नेतृत्व समुदायांना स्थिर ठेवते आणि आवश्यक सेवांची सातत्याने पूर्तता सुनिश्चित करते.

राष्ट्रीय मूल्यांची रुजवण

प्रशिक्षण, प्रशासन आणि नागरिकांशी दैनंदिन संवादाच्या माध्यमातून, अखिल भारतीय सेवा सामायिक जबाबदारीची आणि राष्ट्रीय ध्येयाची भावना वाढवतात. अधिकारी विविध गटांमध्ये मध्यस्थी करतात, वाद सोडवतात आणि सर्वसमावेशक धोरणे अंमलात आणतात, ज्यामुळे एकात्मता आणि शासनावर विश्वास दृढ होतो. या दैनंदिन कार्यातून सामाजिक सुसंवाद वाढतो, कायद्याचा आदर, न्याय आणि सामायिक उद्दिष्टांची भावना बळकट होते — जी एका एकसंध राष्ट्राची पायाभूत मूल्ये आहेत.

अखिल भारतीय सेवा या सरदार पटेल यांच्या या विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. मजबूत संस्था हे एकसंघ भारताचे अधिष्ठान आहेत. त्या दृष्टीला कृतीत, धोरणांना व्यवहारात आणि विचारसरणीला राष्ट्रीय एकात्मतेच्या ठोस रूपात परिवर्तित करतात.

राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने, राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान कोणत्याही राजकीय किंवा सांस्कृतिक प्रयत्नाइतकेच महत्त्वाचे आहे. एकात्मता, निष्पक्षता आणि राष्ट्रीय सेवांचे आदर्श देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत राहतील, हे अखिल भारतीय सेवा सुनिश्चित करतात.

श्री.राजू धोत्रे, विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई -32

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande