
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन व्यक्त केले होते.आता आज,5 नोव्हेंबर रोजी विश्वविजेत्या भारतीय संघाची पंतप्रधान मोदींशी भेट होणार आहे. या भेटीसाठी टीम इंडिया नवी दिल्लीत पोहोचली असून, विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे.
महिला विश्वचषक 2025 चे अंतिम सामने नवी मुंबईत खेळले गेले होते. विजयानंतर भारतीय संघ खास विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना झाला. दिल्लीमध्ये टीम इंडियाचे आगमन होताच खेळाडूंवर फुलवृष्टी करण्यात आली. आरती करून आणि टिळा लावून त्यांचे स्वागत झाले.यानंतर त्यांना माळा घालण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात खेळाडू आनंदाने नाचू लागल्या. यावेळी वातावरण एकदम उत्सवमय झाले होते.
आज सायंकाळी पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाला विशेष डिनरसाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधानांसोबतच्या या खास भेटीसाठी खेळाडू एक विशेष भेटवस्तू घेऊन आले आहेत. वनडे विश्वचषक 2025 मध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेली ऑलराउंडर दीप्ती शर्मा हिने सांगितले की, “आमचा संपूर्ण संघ पंतप्रधानांना देण्यासाठी एका खास भेटीबद्दल विचार करत आहे. ती सर्व खेळाडूंनी साइन केलेली जर्सी असू शकते किंवा कदाचित एक बॅटही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode