
कोल्हापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)। विश्वासार्हतेच्या जोरावर देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामीण डाक पुरस्कारार्थी हे खऱ्या अर्थाने देशाचे नवरत्न आहेत असे गौरोउद्गगार केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण डाक सेवक (GDS) संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती,खासदार धनंजय महाडिक,डाक सेवा (महासंचालक)जितेंद्र गुप्ता,महाराष्ट्र सर्कल मुख्य पोस्ट मास्टर (जनरल)अमिताभ सिंग,पोस्टल सर्विसेस बोर्डचे कार्मिक सदस्य सुवेंदुकुमार स्वैन, पोस्टल सर्विसेस पुणे रिजनचे संचालक अभिजीत बनसोडे व गोवा रिजनचे संचालक रमेश पाटील उपस्थित होते.
सार्वजनिक क्षेत्रात आजही देशात सर्वाधिक विश्वासार्हता पोस्ट विभागाने मिळवली आहे . आधार कार्ड , बचत , पासपोर्ट, गुंतवणूक आदी सेवांबाबत पोस्ट विभागाने उल्लेखनीय कार्य केले आहे.ग्रामीण भागात काम करताना पोस्टमनना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो मात्र ते कधीही कर्तव्यात कसूर करत नाहीत.देशात सध्या पोस्टात सामान्य नागरिकांची सुमारे 37 कोटी खाती उघडण्यात आली असून त्यामध्ये तब्बल 21 कोटींची बचत करण्यात आलेली आहे. देशात 1 लाख 65 हजार इतकी ग्रामीण डाक वितरण केंद्रे कार्यरत असून विकसित भारत - 2047 ची स्वप्न पूर्तता करण्यासाठी पोस्ट विभागाने कार्यरत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
छ.शाहू महाराज म्हणाले,जनतेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडलेला विभाग म्हणजे डाक विभाग असून पोस्टमन हे समाजाच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहेत .तर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, देशात सुमारे नवीन 11 हजार पोस्टांची निर्मिती करण्यात आली आहे.आजही पोस्टमनवर विश्वास दाखवला जातो ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. यावेळी मंत्री महोदय ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सन 2024 - 25 या वर्षामध्ये नवीन खाते उघडणे,टपाल जीवन विमा (PLI) ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) या योजनेचा अधिकाधिक लोकांना लाभ देणे, इन्शुरन्स संकलन,थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्यवहार तसेच नोंदणी करून टपालाचे जलद वितरण (स्पीड पोस्ट) अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुहास पाटील,सुरेश नरके,शशिकांत महाजन,रोहिणी कंधारे,अमृता शेरेकर,अजीज मुजावर,महेंद्र पाटील,राजेंद्र शिंदे,जगन्नाथ राऊत आणि नागनाथ गायकवाड अशा दहा डाक सेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात लाल जॅकेट, टोपी,पोस्ट विभागाची प्रचलित बॅग,सन्मान चिन्ह (पत्र पेटी) व प्रमाणपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सुहास पाटील,श्रीमती रोहिणी कंधारे,जगन्नाथ राऊत व श्रीमती अमृता शेरेकर या सत्कार मूर्तींनी आपल्या भावना व्यक्त करताना,आपण सदैव पोस्ट विभागाची मान उंचावण्यासाठी कार्यरत राहू असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सालेलकर तर आभार प्रदर्शन अमिताभ सिंग यांनी केले. या कार्यक्रमासाठी राज्यातील सुमारे सहा हजाराहून अधिक डाक कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar