नाशिक - अन्न प्रक्रिया पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील - डॉ. सिंह
नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)। अन्नप्रक्रिया पायाभूत सुविधा बळकट करण्यास तसेच त्या संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यास केंद्र सरकारच् प्रयत्नशील असून यासाठी विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्
अन्न प्रक्रिया पायाभूत सुविधा बळकट


नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)।

अन्नप्रक्रिया पायाभूत सुविधा बळकट करण्यास तसेच त्या संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यास केंद्र सरकारच् प्रयत्नशील असून यासाठी विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. रणजीत सिंह यांनी केले. केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयतर्फे अन्न प्रक्रिया विकसिकरणाच्या उद्देशाने किरणोत्सर्गद्वारे निर्जंतुकीकरण व अन्न चाचणी प्रकियांच्या पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण या विषयावर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने निमा सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. रणजित सिंह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक अमित जोशी,अणू ऊर्जा खात्याचे संचालक नितीन जावळे,अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे उपसचिव विवेक सिंग, भाभा अनुसंशोधन केंद्राच्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.एस.गौतम, एनएबीएलचे संयुक्त संचालक सौ.रिनी नारायणन, स्टार्टअप इंडियाचे मार्गदर्शक श्रीकांत पाटील , केसीसीआय संचालक नकुल लाखे,तसेच आयआयटी मुंबईचे अतिथी प्राध्यापक डॉ.सुनील घोष आदी होते. या परिषदेत अन्नसुरक्षितता गुणवत्तावृद्धी,नियमित मानके, शासकीय योजना व प्रोत्साहने तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील बाजार विकासाच्या संधी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिषदेत धोरणकर्ते,शास्त्रज्ञ, उद्योजक आणि गुणवत्ता तज्ञ एकाच मंचावर आले होते. अन्न किरणीकरण आणि अत्याधुनिक अन्न चाचणी सुविधांमुळेल कापणी पश्चात होणारे नुकसान कमी करणे,अनुपालन सुनिश्चित करणे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ करणे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. डॉ.रणजीत सिंह यांनी यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहितीही आपल्या भाषणात सादर केली. उपसचिव विवेक सिंह यांनी नियमक चौकट,मानके आणि उपलब्ध प्रोत्साहन योजनांची माहिती विशद केली. अणुऊर्जा विभागाचे संचालक (प्रशासन) IAS नितीन जावळे आणि डॉ.एस.गौतम यांनी अन्न किरणीकरणाची वैज्ञानिक प्रक्रिया, सुरक्षिततेचे पैलू या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्सचे अँड इंडस्ट्रीजचे संचालक डॉ.अमित जोशी यांनी धोरणकर्ते,संशोधन संस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील संवाद प्रक्रिया बळकट करण्याची गरज प्रतिपादन केली. सौ.रिनी नारायणन यांनी अन्न चाचणी प्रयोगशाळांमध्ये मान्यताप्राप्ती आणि गुणवत्ता हमीचे महत्व विशद केले.डॉ.सुनील घोष यांनी अन्नसुरक्षितता प्रणालीतील नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा सर्वांनी स्वीकार करावा असे नमूद केले. निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी स्थानिक उद्योजकांच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडे असलेल्या मागण्यांचा उहापोह करून त्या सोडविण्याची मागणी केली. नाशकात फूड टेस्टिंग लॅब व्हावी यासाठी निमाचे प्रयत्न सुरू असून त्याकडे केंद्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहनही नहार यांनी केले. गेल्या वर्षभरात नाशकात चाळीस हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात निमाच्या पदाधिकाऱ्यांना यश आल्याची आठवणही त्यांनी करून दिली. सूत्रसंचालन ऊर्जा समितीचे चेअरमन मिलिंद राजपूत व आभार प्रदर्शन स्टार्ट अप कमिटीचे श्रीकांत पाटील यांनी केले. चर्चासत्रास एफ डी ए चे सहआयुक्त मनीष सानप, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे ,कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, अन्न प्रक्रिया कमिटी प्रमुख वैभव नागसेठिया, सचिन कंकरेज, जयश्री कुलकर्णी, कैलास पाटील,नितीन आव्हाड,नानासाहेब देवरे, शुभम कंकरेज,अनिल मंत्री,संजय राठी, संदीप सोमवंशी, रवी राठोड,गुलाब आहेर यांच्यासह उद्योजक तसेच विविध शासकीय संस्थांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande