
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत ६ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव भरविला जातो. हा बाल महोत्सव ६ ते ८ जानेवारी २०२६ या काळात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महोत्सवात नगर परिषद शाळांमधील मुलेही सहभागी होणार आहेत. या बाल महोत्सवात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४४ बाय १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, गायन, नाटिका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी