अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत दिली माहितीनवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : देशातील 47 पैकी 32 राजकीय पक्षांनी ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तर 15 विरोध केल्याची माहिती केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज, गुरुवारी राज्यसभेत दिली.
राज्यसभेत डॉ. भागवत कराड, किरण चौधरी, ब्रिज लाल, नरहरी अमीन, नारायण कोरगप्पा, लहर सिंग सिरोया आणि सुभाष बराला या 7 खासदारांनी ‘एक देश एक निवडणूक’ सबंधी प्रश्न विचारला होता. ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकावर राजकीय पक्षांचे काय मत आहे? सामान्य लोकांना याविषयी काय वाटते? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर उत्तर देताना मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या पद्धतींची तपासणी करण्यासाठी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. समितीने संबंधितांशी व्यापक सल्लामसलत केली आणि आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार 47 राजकीय पक्षांनी प्राप्त अहवालात त्यांचे अभिप्राय दिले आहेत. यामध्ये 32 पक्षांनी एकाच वेळी निवडणुका घेण्यावर सहमती दर्शवली तर 15 पक्षांनी असहमती दर्शविली. ईमेलद्वारेही लोकांचे प्रतिसाद मागवण्यात आले आहेत. यामध्ये 83 टक्के लोकांनी 'एक देश एक निवडणूक' ला पाठिंबा दिला आहे. अहवालात म्हटले आहे की, संकेतस्थळावर ‘एक देश एक निवडणूक’वर एकूण 5232 अभिप्राय प्राप्त झाले. यापैकी 3837 जणांनी पाठिंबा दिला, तर 1395 जणांनी विरोध केला. पोस्टाच्या माध्यमातून मिळालेल्या प्रतिसादांबाबत, अहवालात नमूद केले की, 154 पोस्टल प्रतिसाद प्राप्त झाले. यापैकी 109 जणांनी या कल्पनेला पाठिंबा दिला तर 45 जणांनी विरोध केला. तर 16 हजार 172 प्रतिसाद ईमेलद्वारे प्राप्त झाले. यापैकी 13 हजार 396 (83 टक्के) प्रतिसाद एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने होते, तर 2775 (17 टक्के) प्रतिसाद एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या विरोधात होते.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी