सर्वपक्षीय खासदार जगभरात जाऊन सत्य मांडणार
नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : पहलगामपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तान सतत खोटे बोलत आहे. पाकिस्तानचे खोटेपणा उघड करण्यासाठी, भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाकिस्तानचा भंडाफोड करेल. भारतीय शिष्टमंडळात सर्वपक्षीय 30 खासदार असतील आणि हे शिष्टमंडळ 10 दिवस जगातील विविध देशांना भेटी देऊन सत्य मांडतील.
पहलगाम हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तान सतत्याने खोटे बोलत आहे. तो जगाला एक बनावटी कथा सांगत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला कोणताही मोठा पाठिंबा मिळालेला नाही, परंतु चीन आणि तुर्कीसारख्या देशांनी त्याला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा भारताला उघड करायचा आहे. त्यासाठी राजकिय पातळीवर, भारत सरकारने विविध देशांना भेट देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिष्टमंडळात किती खासदार जाणार आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु असे मानले जाते की शिष्टमंडळात 30 पेक्षा जास्त खासदार जाऊ शकतात. हे खासदार सरकारने ठरवलेल्या देशांच्या विविध ब्लॉक्सना 10 दिवसांसाठी भेट देतील. खासदार त्यांच्या राजकीय मोहिमेवर जाण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालय त्यांना माहिती देईल.
या शिष्टमंडळात भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा), जेडीयू, बीजेडी, सीपीआय(एम) आणि इतर काही पक्षांचे खासदार असतील. त्यांना 22 ते 23 मे दरम्यान प्रवासासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे आणि परराष्ट्र मंत्रालय त्यांच्याशी संपर्क साधून प्रवास कार्यक्रमासह आवश्यक तपशील प्रदान करेल, असे एका पथक प्रमुखाने सांगितले.
या शिष्टमंडळात भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि ओडिशाच्या भाजप खासदार अपराजिता सारंगी यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे 4 खासदारही शिष्टमंडळाचा भाग असतील. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद आणि अमर सिंह यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, जेडीयूचे संजय झा, बीजेडीचे सस्मित पात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, द्रमुकच्या के कनिमोझी, सीपीआय (एम)चे जॉन ब्रिटास आणि एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी देखील या शिष्टमंडळाचा भाग असू शकतात.
शिष्टमंडळ पाठवण्याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरील 2 सर्वपक्षीय बैठकांचे अध्यक्षपद नाकारले. पंतप्रधानांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास सहमती दर्शविली नाही. आम्ही एकतेचे आवाहन करूनही, पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष काँग्रेसची बदनामी करत आहेत.
जयराम रमेश म्हणाले की, आता अचानक पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात बहुपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेहमीच सर्वोच्च राष्ट्रीय हितासाठी भूमिका घेते आणि भाजपप्रमाणे कधीही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचे राजकारण करत नाही. काँग्रेस निश्चितच शिष्टमंडळाचा भाग असेल अशी ग्वाही जयराम रमेश यांनी दिली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi