अरुणाचल प्रदेश : भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू
इटानगर, 31 मे (हिं.स.) : अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यातील पहिली घटना पूर्व कामेंग जिल्ह्यात घडली यात 7 जणांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात घ़डली असून त्या
अरुणाचल प्रदेश : भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू


इटानगर, 31 मे (हिं.स.) : अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यातील पहिली घटना पूर्व कामेंग जिल्ह्यात घडली यात 7 जणांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात घ़डली असून त्यात 2 जण मृत्यूमुखी पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 13 च्या बाना-सेप्पा भागात शुक्रवारी रात्री उशिरा भूस्खलन झाले. यात 2 कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. अपघाताबाबत पूर्व कामेंग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कामदाम सिकोम म्हणाले की, बिचोम डिस्ट्रिक्टच्या बाना येथून सेप्पाच्या दिशेने वाहन जात असताना अचानक भूस्खलन झाले. यामुळे वाहन खोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पण मुसळधार पाऊस, पुन्हा झालेले भूस्खलन आणि रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडथळे आले. तरीही पोलिस आणि बचाव पथकांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. त्यानंतर आज, शनिवारी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. अनेक तासांच्या अथक शोधकार्यानंतर, महामार्गापासून सुमारे 150 मीटर खोल दरीत सर्व सातही जणांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण बाना येथील किचांग गावातील रहिवासी होते. तसेच अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका घटनेत, झिरो-कामले रस्त्यालगतच्या शेतात भूस्खलन झाल्याने 2 कामगारांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना वाचवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

अरुणाचल प्रदेशच्या घटनांशिवाय आसाममध्ये देखील पावसाचा कहर सुरू आहे. आसाममध्ये गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झालाय. तर आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन 10 हजार लोक प्रभावित झाल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने म्हंटले आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande