ढाका, 31 मे (हिं.स.)। बांगलादेशमध्ये
दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या आगमनानंतर पावसाला सुरुवात झाली असून, त्याचा जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे. देशाच्या मुंशीगंज
जिल्ह्यातील उपजिल्ह्यात रोजोट्रेखा कालव्यावर बांधलेला काँक्रीटचा पूल कोसळला.
यामुळे खासकंडी आणि नोलबुनियाकांडी या गावांमधील रस्त्यांचा संपर्क तुटला असून
हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बंगालच्या उपसागरातील दबावामुळे बांगलादेशात जोरदार पावसाचा मारा सुरू आहे.
त्याचाच परिणाम म्हणून मुंशीगंजमध्ये ही घटना घडली. मुंशीगंजला बिक्रमपूर या
नावानेही ओळखले जाते. हे शहर ढाका विभागातील प्रमुख केंद्र असून, मुंशीगंज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. स्थानिक नागरिकांनी
सांगितले की, रोजोट्रेखा कालव्यावर काही
वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. हा पूल खासकंडी आणि नोलबुनियाकांडी या
सुमारे २,००० ते २,५०० लोकसंख्या असलेल्या भागासाठी महत्त्वाचा संपर्कमार्ग होता.
मान्सून देशात सक्रीय – हवामान खात्याचा इशारा
दरम्यान, बांगलादेश हवामान खात्याने
पुढील २४ तासांमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता वर्तवली आहे. रंगपूर, मैमनसिंह, चटगाव आणि सिलहट विभागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम
पावसाचा अंदाज असून, राजशाही, ढाका, खुलना आणि
बारीसाल विभागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात
आली आहे. हवामान खात्याने जाहीर केले आहे की, दक्षिण-पश्चिम मान्सून सध्या बांगलादेशमध्ये सक्रिय आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर