ढाका , 1 जून (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या (आयसीटी) अभियोक्त्याने गेल्या वर्षी जुलैच्या उठावादरम्यान पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा औपचारिक आरोप लावला आहे.याप्रकरणी सरकारी वकिलांनी आज, रविवारी(दि.१) आरोपपत्र दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(दि.१ ) दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये देशभरात झालेल्या सामूहिक हत्याकांडात हसीना शेख यांचे प्रमुख आरोपी म्हणून नाव आहे.याशिवाय माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी मामुन यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. या खटल्याचे बांगलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. खटला दाखल करताना मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम आणि इतर सरकारी वकील उपस्थित होते. तत्पूर्वी, १२ मे रोजी, तपासकर्त्यांनी एक अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, शेख हसीना यांनी या हत्यांचे आदेश दिल्याचे म्हटले आहे.
आयसीटीचे मुख्य अभियोक्ता ताजुल इस्लाम यांनी १२ मे रोजी सांगितले की, हसीना यांच्यावर किमान पाच आरोप आहेत, ज्यात जुलैच्या उठावादरम्यान झालेल्या सामूहिक हत्या रोखण्यात अपयश, चिथावणी, सहभाग आणि कट यांचा समावेश आहे. तपासकर्त्यांनी त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून व्हिडिओ फुटेज, ऑडिओ क्लिप्स, हसीनाचे फोन संभाषण, हेलिकॉप्टर आणि ड्रोन हालचालींचे रेकॉर्ड तसेच पीडितांचे जबाब गोळा केले आहेत.
दरम्यान, शेख हसीना यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
आयसीटी कोर्टाने २५ मे रोजी मागील सरकारशी संबंधित पहिला खटला सुरू केला. त्या प्रकरणात, ५ ऑगस्ट रोजी सहा निदर्शकांना ठार मारल्याबद्दल आठ पोलिस अधिकाऱ्यांवर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode