नागपूर, 1 जून (हिं.स.)।
पुरुषोत्तम दारव्हेकर हे जरी विदर्भाचे होते तरी त्यांना अशा भौगोलिक मर्यादा घालण्याची गरज नाही. त्यांनी आपली कार्यपद्धती आणि संहितालेखनाच्या जोरावर मराठी रंगभूमी सातासमुद्रापार नेली. त्यांच्या या कार्यपद्धतीवर आणि संहितालेखनावर विस्तृत संशोधन होणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले.
सुप्रसिद्ध नाटककार, निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तरांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात त्यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते.
महेश एलकुंचवार म्हणाले, दारव्हेकर मास्तरांनी नभोनाट्याला आकार दिला. त्यांच्या प्रतिभेला नागपुरात वाव न मिळाल्याने ते मुंबईला गेले. दारव्हेकरांनी नाट्यक्षेत्रात एक नवीन पिढी निर्माण केली. नाटक कसे असावे आणि कसे नसावे, याची त्यांना चांगली जाण होती. मराठी रंगभूमीला मास्तरांनी नवी दृष्टी दिली. मुंबईला गेल्यावर त्यांनी अनेक चांगली नाटके केली. मास्तरांची संहिता बघण्यासारखी असायची. प्रत्येक काम कलात्मक करण्याकडे त्यांचा कल असायचा. त्यांच्या संहितांचा अभ्यास केल्यास त्याचा नव्या पिढीला निश्चित फायदा होईल. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षभरात मास्तरांच्या काही कलाकृती पुनरुज्जीवित कराव्यात. चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
मास्तरांच्या अजरामर नाट्यकृती लोकांसमोर सादर करू शकल्यास ती त्यांनी खरी आदरांजली ठरेल. वर्षभर आपण काही वेगवेगळे उपक्रम निश्चित घेण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास अध्यक्षीय समारोप करताना प्रदीप दाते यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले. संचालन आणि आभारप्रदर्शन विवेक अलोणी यांनी केले. यावेळी वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. राजेंद्र डोळके, तीर्थराज कापगते, रंजन दारव्हेकर, सुरेश घड्याळपाटील, नितीन सहस्रबुद्धे, जगदीश सुकळीकर, वृषाली देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर