नांदेड, 13 जून (हिं.स.)।नुकताच राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत मुग व सोयाबीन या पिकाचे उत्पन्न व उत्पादन बाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पिक घेऊन नांदेड जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले आहेत. राज्यस्तरावर पिक स्पर्धेमध्ये क्रमांक आल्याबद्दल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी विजेते शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
पीक स्पर्धेत सोयाबीन या पिकामध्ये आदिवासी गटामध्ये सोयाबीन या पिकात अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील सुभाष विश्वनाथ यलसटवाड यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 50 हजार रुपयाचे पारितोषिक मिळवण्याचा बहुमान मिळविला आहे. उमरी तालुक्यातील धानोरा बु येथील दिगांबर गंगाराम जगताप यांनी आदिवासी गटामध्ये सोयाबीन या पिकात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून 30 हजार रुपयाचे पारितोषिक मिळवले आहे. तसेच सोयाबीन या पिकामध्ये सर्वसाधारण गटामध्ये किनवट तालुक्यातून दहेली येथील परमेश्वर रामजी चव्हाण यांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून रोख रक्कम 40 हजार रुपयाचे पारितोषिक मिळविले आहे. आणि आपल्या शेतीमध्ये आधुनिक पिकपद्धतीचा अवलंब केला. योग्य वाण, योग्य वेळी मशागत, शेंद्रीय खताचा मुबलक वापर करून जमिनीचा कस वाढवून जमिनीचा पोत सुधारून व योग्य खताचा ताळमेळ घालून शेती क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन राज्यस्तरावर क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला.
लोहा तालुक्यातील सायाळ येथील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे तसेच खंडीभर लाल कंधारी गाई जनावरे सांभाळून शेती करणारे शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर यांनी जिल्ह्यातून खरीप हंगामामध्ये मुग या पिकामध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून 30 हजार रुपयाचे पारितोषिक मिळवीले आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांनी आपल्या शेतीत सतत सुधारणा घडवून आणल्या आहेत. विपरीत परिस्थितीत चांगले उत्पादन घेऊन त्यांनी पंचक्रोशीत आपली छाप सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण केल्यामुळे आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे धडे गिरवीताना पाहावयास मिळत आहेत.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने