नांदगाव, 4 जून (हिं.स.)।
- तालुक्यातील सावरगावजवळील मन्याड नदीच्या पुढे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करून पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत पती विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदगाव व चाळीसगाव तालुकादरम्यान असलेल्या मन्याड नदीवरील पुलाच्या पुढे हातगाव शिवारात सावरगाव तालुका नांदगाव येथील विजय सुखदेव चव्हाणके हे पत्नी वर्षा (वय ४०), मुले व आई-वडील यांच्या समवेत शेतात राहत होते. चव्हाणके यांचे अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडलेले होते. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत होते. यातून विजय हा पत्नी वर्षावर चारित्र्याचा संशय घ्यायचा. दि. २ जून रोजी विजय चव्हाणकेने मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके यांना फोन करून पत्नी ठार मारल्याचे सांगितले. हादरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय चव्हाणके व त्याची पत्नी वर्षाच्या शोधासाठी शेतात धाव घेतली असता, झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तर त्याची पत्नी वर्षा गुरांच्या चाऱ्यामध्ये मयत अवस्थेत आढळून आली. विजय चव्हाणके याने पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद अशोक चव्हाणके यांनी पोलिसांत दिली. घटनेची माहिती मिळताच चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI