रत्नागिरी : घेरा यशवंतगड किल्ल्याचे नवीन बांधकाम कोसळले
रत्नागिरी, 4 जून, (हिं. स.) : साखरी नाट (ता. राजापूर) येथील घेरा यशवंतगडाचे नवीन बांधकाम कोसळले आहे. किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला आठ कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे. दीड वर्षापासून क
यशवंतगडाचे ढासळलेले बांधकाम झाकून ठेवण्यात आले आहे


रत्नागिरी, 4 जून, (हिं. स.) : साखरी नाट (ता. राजापूर) येथील घेरा यशवंतगडाचे नवीन बांधकाम कोसळले आहे.

किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला आठ कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे. दीड वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शिवप्रेमींना कधीही विश्वासात घेतले गेलेले नाही. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे स्थानिक सरपंच संदीप बांदकर आणि काही शिवप्रेमींनी वारंवार निदर्शनास आणून दिले. या कामासाठी सुमारे साडेतीनशे फूट खोल बोअरवेल खोदून पाण्याचा वापर होत होता, मात्र हे पाणी खारट असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.

बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड निकृष्ट दर्जाचा आहे. वाळूदेखील खाडीची वापरण्यात येत होती. या सर्वांचा परिणाम म्हणून सुरू असलेले हे बांधकाम पावसाच्या पहिल्याच सरीमुळे ढासळले आहे.

त्यानंतर पुनर्बांधणीसाठी कोणतीही पावले ठेकेदाराकडून उचलली गेली नाहीत.

त्यामुळे नाटे परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संतप्त झाले असून शासनाने पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

शिवसेना राजापूर तालुकाध्यक्ष दीपक नागले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली असून अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींची बदनामी होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. ग्रामस्थ, शिवप्रेमी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराची एकत्रित बैठक आमदारांच्या उपस्थितीत घेतली जाऊन याचा जाब विचारला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

नाटे येथील शिव संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडविलकर यांनीदेखील तीव्र संताप व्यक्त करताना ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट कामामुळे हे बांधकाम ढासळले असून पुरातत्त्व विभाग आणि ठेकेदाराकडे वारंवार कामासंदर्भात माहिती विचारूनसुद्धा कधीही माहिती दिली गेली नाही, असा त्यांचा आक्षेप आहे.

शिव संघर्ष संघटना आणि शिवप्रेमींकडून गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande