अमरावती, 4 जून (हिं.स.) :तालुक्यातील १ हजार ९२६ संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व वादळाचा फटका बसला आहे. त्या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मोर्शी -वरुडचे आ. उमेश यावलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर आ. यावलकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी वरुड-मोर्शी तालुक्यातील १,९२६ संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. सन २०२३ मध्ये झालेली अतिवृष्टी व २०२४ मध्ये झालेली गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. शासनाकडे त्याचा अहवालही पाठवण्यात आला होता, तरीदेखील अद्याप १,९२६ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.
त्यामुळे या मुद्द्याकडे विशेष बाब म्हणून तातडीने लक्ष द्यावे व लवकरात लवकर नुकसान भरपाईपोटी अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळती करावी, अशी मागणी आ. यावलकर यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. याशिवाय मोर्शी मतदारसंघातील रखडलेल्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण विषयाचे गांभीर्य लक्षात घेता लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही आ. यावलकर यांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी