अमरावती, 4 जून (हिं.स.) : महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ ची अंमलबजावणी म्हणून गुरुवार, ५ जून रोजी राजुरा बाजार येथील गुरांचा व बकरी बाजार बंद ठेवला जाणार आहे. महाराष्ट्र गो सेवा आयोग पुणे यांनी पत्राद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीला तसे कळवले आहे. येथील पोलिस स्टेशननेही बाजार समितीला पत्र देऊन बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
क्रूड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ राजुरा बाजार येथे आहे. येथे दर गुरुवारी गुरांचा व बकऱ्यांचा बाजार भरतो. त्यामध्ये शेळी, मेंढी व इतर गुरे विक्रीसाठी आणली जातात. परंतु कायद्याने ५ जून रोजी तसे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी व विक्री करणाऱ्या सर्व शेतकरी, व्यापारी तसेच संबंधित घटकांना सूचित करण्यात आले असून, ५ जून रोजी भरणारा गुरांचा बाजार कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी कोणीही आपली जनावरे विक्रीस आणू नये, असे सांगतानाच पुढील गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार १२ जून रोजी नियमित भरेल यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे, उपसभापती बाबाराव मांगुळकर तसेच सर्व संचालक आणि सचिव नंदकिशोर बोडखे यांनी केले आहे.
जिल्ह्यात आठ ठिकाणी उभारले तपासणी नाके
येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची तस्करी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गोवंशाची वाहतूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागानेही दक्ष राहावे. तसेच गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे पोलिसांतर्फे कळवण्यात आले आहे.--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी