मुंबई, 9 जून (हिं.स.)।हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं ७५ व्या वर्षी निधन झालं आहे. पार्थो घोष यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पार्थो घोष यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.पार्थो यांनी ९० च्या दशकात सामाजिक आणि संवेदनशील अश्या विषयांवर अनेक गाजलेले सिनेमे केले आहेत. सिनेसृष्टीतून अनेकांनी पार्थो घोष यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पार्थो घोष यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेत्री रितुपर्णा घोष भावुक झाली. 'मी माझ्या भावना शब्दात शब्दात मांडू शकत नाही. आपण एक प्रतिभावान, दूरदर्शी आणि दयाळु दिग्दर्शक गमावला आहे. पार्थो दा, तुमच्या सिनेमांची जादू कायम स्मरणात राहील.
१९९१ साली आलेल्या '१०० डेज' सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ यामध्ये मुख्य भूमिकेत होते. हा थ्रिलर सिनेमा होता ज्यात पार्थो घोष यांचं दिग्दर्शन कौशल्य पाहायला मिळालं. १९९६ साली आलेल्या 'अग्नी साक्षी' सिनेमामुळे त्यांना ओळख मिळाली. यामध्ये मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांची महत्वाची भूमिका होती. कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यावर सिनेमा आधारित होता.
यानंतर १९९७ साली त्यांनी 'गुलाम ए मुस्तफा' या अंडरवर्ल्ड आणि मानवी संवेदना या विषयावर सिनेमा आणला. यामध्ये नाना पाटेकर आणि रवीना टंडन यांचं दमदार अभिनय पाहायला मिळाला. तसंच घोष यांच्या दिग्दर्शन कौशल्यामुळे हा सिनेमा कल्ट मानला गेला.
पार्थो घोष यांचे सिनेमे केवळ बॉक्सऑफिसवर यशस्वी झाले नाही तर त्यांच्या सामाजिक विषयांवरील सिनेमांमुळे जनजागृतीही मोठ्या प्रमाणात झाली. आजही त्यांचे सिनेमे लोकांना प्रेरित करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode