मुंबई, ९ जून, (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून आज, सोमवारी सकाळी ८ प्रवासी खाली पडल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर ठाणे सामान्य रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त प्रवासी दरवाज्यांवर लटकून प्रवास करत होते. या प्रवाशांपैकी काहीजण ट्रेनच्या वळणावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतील प्रवाशांचा धक्का लागून ही दुर्घटना झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी यासंदर्भात सांगितले, “ही गाडींची थेट धडक नव्हती. दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनच्या पायऱ्यांवर लटकलेले प्रवासी एकमेकांमध्ये अडकल्याने ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ट्रेन वळणावर असताना एका बाजूला झुकते, त्यामुळे दोन ट्रेनमधील अंतर कमी होण्याची शक्यता असते. हे देखील एक संभाव्य कारण असू शकते.”
रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून मदतकार्य केले, अपघाताची चौकशी सुरू आहे. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली. मुंब्रा हे ठाण्याच्या उपनगरातील एक अतिगर्दीचे आणि वर्दळीचे स्थानक असून, अशा दुर्घटनांची शक्यता नेहमीच निर्माण होते.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी तयार होणाऱ्या सर्व नव्या गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाज्यांची यंत्रणा तयार करत आहे. तसेच, सध्या वापरात असलेल्या लोकल डब्यांचेही डिझाईन बदलून त्यात दरवाजे आपोआप बंद होण्याची सुविधा जोडण्यात येणार आहे.
या दुर्घटनेमुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X पोस्टद्वारे दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले, “दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, स्थानिक प्रशासन समन्वय साधून काम करत आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी