रांची, 31 जुलै (हिं.स.) - डॉक्टरांनी व्यक्तिगत पातळीवरही सर्वसमावेशक आरोग्यसेवा हे तत्त्व अंगिकारावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. झारखंडमधील देवघर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ आज, गुरुवारी पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले.
त्या पुढे म्हणाल्या की, देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेअंतर्गत प्रामुख्याने तृतीयक आरोग्यसेवांवर भर दिला गेला असला तरी, या संस्थेने प्राथमिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही सक्रिय मार्गदर्शन आणि सहकार्य पुरवले पाहिजे. प्राथमिक सेवा हा सार्वत्रिक आरोग्य विषयक संरक्षण कवचाचा आधार आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या चमूने शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण सामुदायिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मदत करावी. दरम्यान राष्ट्रीय पातळीवर, सरकार जनतेवरचा आरोग्याशी संबंधित खर्चाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
आपल्या देशाला आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करायची आहेत. ही राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्यसेवांमध्ये असलेली विषमता दूर करण्यासाठी स्थापन केलेल्या देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसारख्या वैद्यकीय संस्था म्हणजे अंधःकारात प्रकाश निर्माण पसरवणारे दीपस्तंभ आहेत. या संस्थांनी कमी खर्चात जागतिक दर्जाची तज्ञता असलेली वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासोबतच, आरोग्यसेवा विषयक परिसंस्थेत बदल घडवून आणणारे घटक म्हणूनही भूमिका बजावायची आहे असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी