
वॉशिंग्टन , 21 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात ट्रम्प यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले, मात्र ट्रम्प यांनी 2025 मधील सर्वात मोठी घटना हि भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा केला आहे.
ट्रम्प यांचे म्हणणे आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणाव इतका वाढला होता की अणुहल्ल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणणे ही त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळातील सर्वात मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या मते, “गेल्या दहा महिन्यांत मी आठ युद्धे थांबवली आहेत. विशेषतः पाकिस्तान आणि भारतमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. दोन्ही देशांनी एकमेकांची आठ लढाऊ विमाने पाडली होती. माझ्या मते ते अणुहल्ल्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.”
ट्रम्प यांच्या मते, “प्रत्येक युद्ध थांबवल्याबद्दल मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा. मी लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. नोबेल जिंकणाऱ्या मारिया मचाडो यांनीही सांगितले आहे की त्या या पुरस्काराच्या खऱ्या हकदार नाहीत, तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच आहेत.”
उल्लेखनीय म्हणजे, 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. दहशतवाद्यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या पाकिस्तानी सैन्यावरही भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत अनेक हवाई तळ नष्ट केले होते.
दोन्ही देशांमध्ये चार दिवस चाललेल्या या तणावाच्या काळात भारताने कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र, ट्रम्प सातत्याने शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांचा दावा आहे की अमेरिकेने व्यापार न करण्याची धमकी दिल्यानंतरच भारत आणि पाकिस्तान मागे हटले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode