
* नावनोंदणी करण्याचे आवाहन
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 'कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद २०२६' (AI Impact Summit) अंतर्गत 'कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – अन्न आणि हवामान लवचिकतेसाठी बुद्धिमत्तेचा विस्तार' या विषयावर २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:२५ एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.
'शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI4Agri) या संकल्पनेद्वारे शेतीचे भविष्य बदलणे आणि प्रत्येक एकरापर्यंत हे आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट
आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागासोबतच 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी-तंत्रज्ञान नवोपक्रम केंद्र' (AIAIC) यात आयोजक म्हणून सहभागी आहेत. या माध्यमातून भविष्यातील शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर कशी करता येईल, यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या निसर्गाचा समतोल राखत अन्न सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे, याचे सविस्तर विश्लेषण या सत्रात केले जाईल.
या महत्त्वपूर्ण परिषदेत सहभागी होण्यासाठी कृषी तज्ज्ञ, तंत्रज्ञान अभ्यासक आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. https://impact.indiaai.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन 'कार्यक्रमात सहभागी व्हा' (Join the Event) या पर्यायावर क्लिक करून नावनोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.
जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, मुंबई येथे देखील २२ आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी