


नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.)। अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा वाढत चालला असून अनेक राज्यांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, छत्तीसगड आणि हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये गॅस एजन्सींसमोर लांबलचक रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी सिलेंडरच्या कमतरतेमुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक भागात सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाला असून व्यावसायिक सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये नागरिक काल रात्रीपासून गॅस एजन्सींसमोर सिलेंडर मिळण्याच्या प्रतीक्षेत उभे आहेत. अनेकांना अजूनही सिलेंडर मिळालेला नाही. कन्नौजमध्येही सिलेंडरसाठी एजन्सीसमोर मोठी गर्दी झाली आणि काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मध्य प्रदेशातही परिस्थिती तितकीच गंभीर असून भोपाळ आणि इंदूरसारख्या शहरांमध्ये वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण सिलेंडरसाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तातसिलेंडरचे वितरण केले जात आहे.
या संकटाचा मोठा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायालाही बसत आहे. मध्य प्रदेशातील सुमारे ५० हजारांहून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना गेल्या पाच दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर मिळालेले नाहीत. अनेक ठिकाणी फक्त २४ ते ४८ तासांचा गॅस साठा उरला असून काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही व्यावसायिकांनी पर्याय म्हणून इंडक्शन स्टोव्ह आणि डिझेल फर्नेसचा वापर सुरू केला आहे.
बिहारमध्ये गॅस एजन्सींच्या बाहेर लोकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास उन्हात उभे राहावे लागत आहे. गॅसच्या कमतरतेचा परिणाम बाजारातही जाणवू लागला असून लाकूड आणि कोळशाची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. इंडक्शन स्टोव्हच्या किमतीही जवळपास पाचपट वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
राजस्थानमध्ये परिस्थिती आणखी कठीण बनली आहे. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंग करूनही त्यांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. गॅसच्या कमतरतेमुळे अनेक हॉटेल्समध्ये लाकडावर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. पंजाब आणि चंदीगडमध्येही गॅसचा तुटवडा कायम आहे. बर्नाला येथे सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
छत्तीसगडमध्ये रायपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस एजन्सी आणि गोदामांसमोर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे. कडक उन्हात तासन्तास उभे राहून लोक आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी सिलेंडर साठवून ठेवून जादा दराने विक्री केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. या संकटाचा फायदा घेत साठेबाजांनी मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू केल्याचे दिसत आहे. काही भागात घरगुती सिलेंडरचे दर ४००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
हरियाणामध्येही घरगुती सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी तब्बल २५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागतो आहे. अनेक ठिकाणी ऑनलाइन बुकिंग सेवा बंद असल्याने किंवा फोन कॉल्सना उत्तर मिळत नसल्याने नागरिक थेट गॅस एजन्सींकडे जाऊन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही राज्यांतील गोदामांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील अनेक ठिकाणी साठेबाजीविरोधात कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते देशातील एलपीजी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात एजन्सींसमोर लागलेल्या लांबलचक रांगांमुळे संकट अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. देशभरात वाढत्या गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वच घटक चिंतेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule