
पंतप्रधानांनी केले 18. 680 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
कोलकाता, 14 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तनाची लाट उसळली असून जनता बदलासाठी सज्ज असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शनिवारी आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की ब्रिगेड परेड ग्राऊंडचा इतिहास देशाला दिशा देणाऱ्या आंदोलनांचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात याच मैदानातून ब्रिटिश सत्तेविरोधात उठलेला आवाज संपूर्ण देशभर क्रांतीत परिवर्तित झाला होता. त्याचप्रमाणे आता “नव्या बंगाल”च्या निर्मितीचा बिगुलही याच ठिकाणाहून वाजत असल्याचे त्यांनी नमूद केले. बंगालमध्ये बदलाची इच्छा आता भिंतींवर लिहिली गेली आहे आणि लोकांच्या मनातही कोरली गेल्याचे मोदी म्हणाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी आरोप केला की राज्य सरकारने या सभेला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांना सभेला येण्यापासून रोखण्यासाठी पूल बंद करण्यात आले, वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली तसेच भाजपचे झेंडे व पोस्टर काढून टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. तसेच एवढ्या अडथळ्यांनंतरही मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला त्यांनी “परिवर्तनाची लाट” असे संबोधले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की आधी काँग्रेस, त्यानंतर डाव्या पक्षांचे सरकार आणि आता तृणमूल काँग्रेस या सर्व काळात बंगालचा विकास खुंटला आहे. कट मनी, कमिशन आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणामुळे विकास योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
सभेदरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना त्यांनी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आणि आयुष्यमान भारत या योजनांचा उल्लेख केला. या योजनांमुळे देशभरातील लाखो लोकांना लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकारच्या भूमिकेमुळे या योजनांचा पूर्ण लाभ लोकांना मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 18.680 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यात रस्ते, रेल्वे आणि बंदरांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी अमृत भारत अंतर्गत राज्यातील सहा पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले तसेच पुरुलिया-आनंद विहार टर्मिनल एक्स्प्रेसया रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.भक्कम पायाभूत सुविधा आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी ही “विकसित बंगाल”ची मजबूत पायाभरणी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत बंगाल पुन्हा एकदा देशाच्या विकासाला दिशा देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी