
नांदेड, 23 मार्च (हिं.स.)किनवट तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ईस्लापूर परिसरातील गोंडेमहागाव, तोटंबा, सावरगाव, मानसिंग नाईक तांडा, इरेगाव, मारलागुंडा आशा १० ग्रामपंचायतींनी विहीर व बोअरवेल अधिग्रहणासाठी किनवट पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
मार्च महिन्यातच अनेक ठिकाणी विहिरी, बोअरवेल आणि हातपंप आटल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे महिलांना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शासनाच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत काही ठिकाणी कामे सुरू असली तरी ती अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
परिसरात अनेक ठिकाणी साठवण तलाव असूनही गाळ साचल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे. तलावांचे खोलीकरण व गाळ काढण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्या भागात पाण्याची समस्या तीव्र आहे, त्या ठिकाणी पाणी साठवणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शासनाने यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis