
नांदेड, 29 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यात वाढत्या
उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगणवाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत अंगणवाड्या सकाळी ८ ते ११.४५ या वेळेत भरविण्यात येणार आहेत. महिला व बालविकास विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. किमान तापमान २१ अंशांच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत तापमान ४० अंशांपर्यंत पोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढून ४५ ते ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अंगणवाड्यांच्या वेळेत हा बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी अंगणवाड्या सकाळी ९.३० ते दुपारी १.१५ या वेळेत भरत होत्या.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळित होत असून दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्ते ओस पडत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis