
मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : राज्य शासनाच्या १५० ई – गव्हर्नन्स कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत ५७ मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २०० पैकी १७०.५० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा गौरव प्रदान करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ई-गव्हर्नन्स अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नाविन्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवून कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा प्रणाली विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, GIS आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून पाणीपुरवठा व्यवस्थापन, तक्रार निवारण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यात आले आहे.
AI आधारित प्रणालीद्वारे पाणीपुरवठा, गुणवत्ता, दाब आणि वापर यांचे रिअल-टाईम विश्लेषण केले जात असून नागरिकांच्या अभिप्रायाचे स्वयंचलित विश्लेषण करून सेवेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. तसेच GIS व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिओटॅगिंग, नकाशे व निर्णय सहाय्य प्रणाली (Decision Support System) विकसित करून नियोजन आणि निर्णयप्रक्रिया अधिक अचूक करण्यात आली आहे.
तक्रार निवारण प्रणाली सुदृढ करून वेळेत तक्रारींचे निराकरण, डेटा विश्लेषण आणि एस्कलेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-ऑफिस व डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभीकरण, डेटा अद्ययावतीकरण आणि कामकाजाचे प्रभावी निरीक्षण केले जात आहे.
हे सर्व उपक्रम प्रधान सचिव श्री पराग जैन-नैनुटिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या प्रयत्नांमुळे विभागाची कार्यक्षमता वाढली असून खर्च व वेळेची बचत, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढण्यास मोठी मदत झाली आहे. याच नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक कामांमुळे विभागाला हा पुरस्कार मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर