उधना-सुभेदारगंज विशेष गाडीला मुदतवाढ
जळगाव, 01 एप्रिल (हिं.स.)प्रवाशांची वाढती गर्दी आणि मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उधना ते सुभेदारगंज दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून यामु
उधना-सुभेदारगंज विशेष गाडीला मुदतवाढ


जळगाव, 01 एप्रिल (हिं.स.)प्रवाशांची वाढती गर्दी आणि मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उधना ते सुभेदारगंज दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून यामुळे खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष गाडीला अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ सारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असल्याने या भागातील नागरिकांना प्रवासासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत होता. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०४१५६ उधना-सुभेदारगंज विशेष गाडीची सेवा पूर्वी ३१ मार्च २०२६ पर्यंतच मर्यादित होती. मात्र प्रवाशांच्या मागणीचा विचार करून आता ही गाडी १४ जुलै २०२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी दर मंगळवार आणि शुक्रवार दुपारी ४.१५ वाजता उधना स्थानकावरून सुटते आणि विविध स्थानकांवर थांबे घेत दुसऱ्या दिवशी रात्री सुभेदारगंज येथे पोहोचते. तसेच ०४१५५ सुभेदारगंज-उधना परतीच्या गाडीची सेवा देखील वाढवण्यात आली आहे. ही गाडी पूर्वी ३० मार्चपर्यंत चालणार होती, मात्र आता ती १३ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे. ही गाडी दर सोमवार आणि गुरुवारी सकाळी ११.४० वाजता सुभेदारगंज येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी उधना येथे पोहोचते. या गाडीला अप आणि डाऊन मार्गावर व्यारा, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, झांसी, ओराई, पोखरायण, गोविंदपूर आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

एकूणच, या निर्णयामुळे खान्देशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही गाडी अधिक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande