
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। बाबासाहेब हे केवळ संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या मूल्यांचा गौरव करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच देशातील शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहासारख्या ऐतिहासिक आंदोलनांनी दलित आणि वंचित समाजात आत्मसन्मान जागवला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून सुरू केलेल्या संविधान दिनाचा उल्लेख करत, संविधानाच्या सन्मानाची परंपरा अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. “आज सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाच्या कामाला वेग आल्याची माहिती दिली. या स्मारकामुळे बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“आजचा दिवस हा केवळ जयंती नसून भारताच्या स्वाभिमानाचा आणि विवेकाचा उत्सव आहे. बाबासाहेबांचे विचार जपणे आणि ते आचरणात आणणे, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,” असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, संजय शिरसाट, संजय राठोड, आशिष शेलार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी खासदार राहुल शेवाळे,मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिवसेना सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी आवर्जून उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर