

मुंबई विभागीय अंतिम सोहळ्यात सुमारे 750 उत्साही युवांचा सहभाग
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने माय भारत मंचाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या माय भारत बजेट क्वेस्ट 2026 (मुंबई विभाग) ची सांगता डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात यशस्वीरित्या झाली. दोन दिवस (12–13 एप्रिल 2026) चाललेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा आणि पुदुच्चेरी येथील युवा स्पर्धक एकत्र आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पश्चात, 'माय भारत' चे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी 'माय भारत' या विषयावर एक अत्यंत वेधक आणि माहितीपूर्ण सत्र घेतले.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मधील महत्त्वाच्या संकल्पनांवर तज्ज्ञमंडळ चर्चासत्रे, हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. या संकल्पनांमध्ये विकसित कृषी आणि मनुष्यबळ विकास या बाबींचाही समावेश होता. तज्ज्ञमंडळ चर्चासत्रांमध्ये सचिन जाधव, अक्षय खोरागडे, गौरव गुप्ता, अमित गुप्ता, राजलक्ष्मी पाटील आणि विनय कुमार आवारे यांसारख्या नामवंत तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन संकेत कळंबे यांनी केले. संवादी चर्चेच्या माध्यमातून युवांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी उपस्थित युवांना मार्गदर्शन केले. सार्वजनिक धोरणाला आकार देण्यात सुजाण सहभाग आणि जागृतीचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी तरुणांना राष्ट्रनिर्माणाच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधित केले. भारताच्या विकास यात्रेला आकार देण्यात युवावर्गाच्या सक्रिय भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचप्रतिज्ञांच्या महत्त्वावर भर देताना त्यांनी विकसित भारत @2047 संकल्पपूर्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन तरुण नागरिकांना केले.
या उपक्रमाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित करत, बजेट क्वेस्ट 2026 च्या माध्यमातून रचनात्मक संवादाला चालना आणि विस्तृत सहभाग यांचे कौतुक करणारा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. असे मंच युवांना धोरण निर्मितीमध्ये सक्रिय योगदान देण्यास सक्षम करतात, तसेच सहभागी प्रशासनाला बळकटी देतात, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दोन दिवसांच्या या कार्यक्रमात 'नारी शक्ती : विकसित भारताचा आवाज - समावेशक लोकशाहीला बळकटी' या संकल्पनेअंतर्गत आयोजित 'नारी शक्ती युवा संसद' मध्ये 350 पेक्षा जास्त महिलांनी संसदीय-शैलीतील चर्चेत भाग घेतला आणि कायदेमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या समर्थनाचा ठराव संमत केला. या कार्यक्रमाला सुजाता पाटील यांची उपस्थिती लाभली.
माय भारत बजेट क्वेस्ट 2026 अंतिम सोहळ्यात निवडक 750 युवांनी भाग घेतला. त्यांनी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांशी सक्रिय संवाद साधत 'विकसित भारत @2047' चा संकल्प अधिक दृढ केला आणि राष्ट्रउभारणीत भारताच्या युवा पिढीची ऊर्जा, कल्पना आणि वचनबद्धतेचे दर्शन घडवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule