
-देशात पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढून १५१ टनांवर
-पहिल्यांदाच सोन्यातील गुंतवणुकीची मागणी दागिन्यांच्या खरेदीपेक्षा पुढे
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.)। भारतात पारंपरिकपणे दागिन्यांच्या स्वरूपात सोने खरेदी करण्याची प्रथा राहिली आहे, पण आता चित्र बदलत आहे. सोन्यातील गुंतवणुकीची मागणी दागिने तयार करण्यासाठी होणाऱ्या सोन्याच्या खरेदीपेक्षा पुढे गेली आहे. देशात पहिल्यांदाच गुंतवणुकीसाठी ८६ मेट्रिक टन सोने वापरण्यात आले, तर दागिन्यांमध्ये फक्त ६६ मेट्रिक टन सोन्याची खपत झाली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (डब्ल्यूजीसी) ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की ३१ मार्चला संपलेल्या तिमाहीत भारतात गुंतवणुकीची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत ५२ टक्क्यांनी वाढून ८२ मेट्रिक टन झाली, तर दागिन्यांची मागणी १९.५ टक्क्यांनी घसरून ६६ मेट्रिक टनांवर आली. अहवालानुसार मार्च तिमाहीत भारतात सोन्यातील गुंतवणुकीची मागणी पहिल्यांदाच दागिन्यांच्या खपापेक्षा जास्त झाली, कारण इक्विटी बाजारातून कमी परतावा मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातूकडे वळण घेतले.
डब्ल्यूजीसी ने आपल्या अहवालात म्हटले आहे की जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने ग्राहक देश असलेल्या भारतात गुंतवणुकीची मजबूत मागणी, वाढत्या किमतींमुळे दागिन्यांच्या खरेदीत झालेली घट काही प्रमाणात भरून काढत आहे, ज्यामुळे एकूण मागणी स्थिर राहिली आहे. डब्ल्यूजीसीचे भारतातील कार्यकारी प्रमुख सचिन जैन यांनी सांगितले, “पहिल्यांदाच गुंतवणुकीची मागणी दागिन्यांच्या मागणीपेक्षा जास्त झाली आहे.” “पुढील तिमाहींमध्ये गुंतवणुकीची मागणी आणखी महत्त्वाची ठरेल, कारण वित्तीय आणि किरकोळ दोन्ही प्रकारचे गुंतवणूकदार सोन्यात अधिक रस दाखवत आहेत.”
देशात सोन्याची एकूण किती खपत
आकडेवारीनुसार मार्च तिमाहीत देशात एकूण सोन्याची खपत १०.२ टक्क्यांनी वाढून १५१ मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. पहिल्यांदाच एकूण खपात गुंतवणुकीचा वाटा दागिन्यांपेक्षा जास्त राहिला, जो तिमाहीत ५४.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला. साधारणतः भारताच्या एकूण सोन्याच्या खपात गुंतवणुकीचा वाटा सुमारे एक चतुर्थांश असतो, पण वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार नाणी, बार आणि गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) खरेदी करत आहेत.
गोल्ड ईटीएफची सर्वाधिक मागणी
डब्ल्यूजीसीच्या मते मार्च तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १८६ टक्क्यांनी वाढून विक्रमी २० मेट्रिक टन झाली आहे. आकडेवारीनुसार अलीकडील तिमाहींमध्ये कमकुवत शेअर बाजार कामगिरीमुळे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफकडे आकर्षित होत आहेत आणि हा कल पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत सोन्याच्या किमती २०२५ च्या सुरुवातीपासून जवळपास दुप्पट झाल्या आहेत, तर भारताचा बेंचमार्क निफ्टी ५० या कालावधीत केवळ २.४ टक्क्यांनी वाढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule