
- मुख्यमंत्री, डीजीपी, एसआयटी प्रमुखांकडे पाठवली माहिती- चाकणकर-खरातमध्ये 177 कॉल; 33,727 सेकंदाचं संभाषण
मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) - भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. याचदरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खरातचा सीडीआर अंजली दमानियांच्या हाती लागला आहे. त्या सीडीआरची कॉपी आणि तदानुषंगिक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती दमानिया यांनी दिली.
दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. बहीण प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स खरातला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये 10 इनकमिंग, 7 आऊट गोईंग होते. यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालं, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स, मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांचा एक कॉल खरातला झाला.
अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची माहिती घेतली. यामध्ये तृप्ती खरात पहिलं नाव आहे. दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहे. 33 हजार 727 सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरातशी बोलल्या होत्या. आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही. दिपक लोंढे तिसरं नावं आहे. दिपक लोंढे (केसरकरांचे निकटवर्तीय) यांचे 189 कॉल्स झाले होते. 30 हजार 529 सेकंद कॉल्स झाले.
अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत, एखाद्या भोंदू बाबाला राज्याचे उपमुख्यमंत्री 17 वेळा कॉल का करतात? त्यांच्यात 21 मिनिटे काय चर्चा झाली, हे जनतेला समजायला हवे. दमानिया यांनी दावा केला आहे की, खरातला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कतार, युएई आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतूनही मोठ्या प्रमाणावर फोन आले आहेत. हे केवळ नॉर्मल कॉलचे रेकॉर्ड आहेत, व्हॉट्सअॅप कॉल्सची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
पतसंस्थेच्या शेकडो खात्यांत खरात नाॅमिनी
दरम्यान तपासात कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी