
विशाखापट्टणम, 03 एप्रिल (हिं.स.) : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही अणु पाणबुडी आणि आयएनएस तारागिरी ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात “शब्द नाही, शक्ति आहे, ‘अरिदमन’!” असे नमूद करत कौतुक केले आहे.
आयएनएस अरिदमन भारताची तिसरी अणुउर्जित बैलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. ही के-15 आणि के-4 सारख्या प्राणघातक बैलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे आणि पाण्याखाली सुमारे 44 किलोमीटर प्रति तास वेगाने हालचाल करू शकते. तिची अदृश्यता आणि उच्च मारक क्षमता भारतीय नौदलाच्या अणु-प्रतिरोधक शक्ती आणि सामरिक क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ करते. आकार आणि क्षमता या दृष्टीने अरिदमन तिच्या श्रेणीतील पहिल्या दोन पाणबुड्यांपेक्षा मोठी आणि अधिक शक्तिशाली आहे. यासोबतच चौथी पाणबुडीही या श्रेणीची आहे, जी सध्या समुद्री चाचण्यांमध्ये (सी ट्रायल) आहे आणि पुढील वर्षी नौदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
पाणबुडीसोबतच नौदलात आईएनएस तारागिरी देखील सहभागी झाली. आयएनएस तारागिरी प्रोजेक्ट 17-ए ची चौथी आधुनिक आणि स्वदेशी फ्रिगेट आहे. तब्बल 6,670 टन वजनाचे हे युद्धजहाज ‘मेक इन इंडिया’ क्षमतेचे आणि भारतीय शिपयार्ड्सच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे. हे युद्धजहाज 75 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी साहित्य वापरून तयार केले आहे आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थितींमध्ये जलद बदलत्या वातावरणात भारतीय नौदलाच्या सामरिक क्षमतांना बळकटी देईल.
विशेषज्ञांच्या मते, अरिदमन आणि तारागिरीच्या कमीशनिंगचा वेळ सध्या अत्यंत महत्वाचा आहे. कारण हिंद-प्रशांत क्षेत्रातील भारताची भूमिका वाढत आहे आणि देशाच्या पूर्व किनाऱ्याचे रणनीतिक महत्त्व सतत वाढत आहे. या समारंभातून भारतीय नौदलाची सामरिक स्वावलंबनता आणि आधुनिकता यांचा स्पष्ट संदेश मिळाला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी