
जळगाव, 03 एप्रिल, (हिं.स.) - रेल्वे गाड्यांमध्ये वाढती गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद बघून रेल्वे प्रशासनाने भुसावळ आणि जळगावमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांना मुदतवाढ दिली. अशातच आता मध्य रेल्वेने भुसावळ-दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव, अमळनेर, धरणगावसह खान्देशातील प्रवाशांना दिलासा मिळेल.
जुलैच्या अखेरपर्यंत या गाड्या सुरू राहणार आहेत.०९०४९ दादर -भुसावळ साप्ताहिक विशेष गाडी जी पूर्वी २७ मार्च २०२६ पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यात येणार होती, तिचा कालावधी आता ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे. तसेच ०९०५० भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २७ मार्चवरून वाढवून ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे. ०९०५१ दादर भुसावळ त्रिसाप्ताहिक विशेष गाडी जी २८ मार्चपर्यंत दर सोमवार, बुधवार व शनिवार धावणार होती, तिचा कालावधी आता २९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.त्याचप्रमाणे ०९०५२ भुसावळ –दादर त्रिसाप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २८ मार्चवरून वाढवून २९ जुलैपर्यंत करण्यात आला आहे. या सर्व गाड्यांच्या वेळा, मार्ग, संरचना व थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. दरम्यान, ही गाडी भुसावळ येथून मुंबईकडे जातानाअतिशय सोयीची ठरते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर