
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख नागरिकांना शासकीय रुग्णालये तसेच आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवेचे प्रभावी कवच मिळाले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनांअंतर्गत तब्बल १५० कोटी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरत आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या दोन प्रमुख योजनांसह महिला व बालकांसाठी विविध मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण झाल्यामुळे लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचत आहे. आयुष्मान कार्ड योजनेच्या माध्यमातूनही अनेक लाभार्थ्यांना उपचाराचा फायदा मिळत आहे.
आतापर्यंत सुमारे पाच हजार नागरिकांपर्यंत या योजनांचा थेट लाभ पोहोचवण्यात प्रशासनाला यश आले असून, गरजूंसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड