
पुणे, 25 मे (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून सुमारे ९१ लाख १६ हजार ३२५ मतदारांच्या नोंदींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. घराघरात भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्म द्वारे मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लीकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे. २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मोहीमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून २० ते २९ जूनदरम्यान गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील.५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, तर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. ७ ऑक्टोबर २०२६ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे ४ हजार ५५७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए)या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, अशी ग्वाही श्री. डुडी यांनी यावेळी दिली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु