
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.)। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून जनतेच्या खिशावर कात्री लावल्याचा आरोप केला आहे. निवडणुकांनंतर इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करून मोदी सरकार जनतेवर बोजा टाकत आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, महागाईचा पुन्हा एकदा जनतेवर हल्ला झाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर टप्प्याटप्प्याने वाढवले जात आहेत, जेणेकरून हळूहळू जनतेचा खिसा कापला जाईल. त्यांनी आरोप केला की, गेल्या अनेक महिन्यांपासून ते आर्थिक संकटाचा इशारा देत होते, मात्र पंतप्रधान निवडणुकांमध्ये व्यस्त होते आणि निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेल आठ रुपयांनी महाग करण्यात आले. त्यांनी म्हटले की, ही दरवाढ पुढेही सुरू राहणार असून मोदी सरकारचे एकच काम आहे, निवडणुकांमध्ये आश्वासने देणे आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करणे.
गेल्या एका महिन्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीत सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 25 मे रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर झाला. याआधी 23 मे रोजी पेट्रोलमध्ये 87 पैसे आणि डिझेलमध्ये 91 पैशांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर पेट्रोल 99.51 रुपये आणि डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर झाले होते. 18 मे रोजीदेखील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुमारे 90 पैसे प्रति लिटर वाढ झाली होती तसेच सीएनजीही एक रुपया प्रति किलोने महाग झाली होती. त्याआधी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. त्याच दिवशी सीएनजीही दोन रुपये प्रति किलोने महाग झाला होता. यापूर्वी 01 मे रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 993 रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यामुळे दिल्लीत त्याची किंमत 3,071.50 रुपये झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule